आपले नेतेपुणे जिल्ह्यातील धनगर समाजाचे पहिले आमदार

पुणे जिल्ह्यातील धनगर समाजाचे पहिले आमदार

spot_img

‘पुणे तिथे काय उणे’, असे अभिमानाने म्हटले जाते. याच पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये धनगर समाजाने भरीव योगदान दिलेले आहे. पण माहिती तंत्रज्ञान स्पर्धेचे युगामध्ये धनगर समाजातील व्यक्ति, संस्था व संघटना  विविध यंत्रणे कडून दुर्लक्षितच राहिल्या. म्हणूनच धनगर समाजाचा जो काही दुर्लक्षित इतिहास आहे तो आपण धनगर माझाच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने राज्यातील धनगर समाजापुढे ठेवणार आहोत. जेणे करून या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील व्यक्ति, संस्था, संघटना यांना मोलाचे योगदान ठरणार आहे.

आज पर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण पाच आमदार झाले. यामध्ये पहिले आमदार म्हणून पोपटराव कोकरे यांना मान जातो. १९७२ मध्ये ते शिरूर विधानसभा मतदार संघातून निवडून गेले.  त्यांच्यानंतर दुसरे आमदार म्हणून इंदापूरचे गणपतराव पाटील हे १९८५ च्या विधानसभेमध्ये निवडून गेले.  त्यांनी पुढे दहा वर्षे इंदापूर विधानसभेच आमदार म्हणून नेतृत्व केले.  त्यांच्यानंतर बारामती मधून विजयराव मोरे यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर १९९५ ते २००४ पर्यंत शिरूर विधानसभा मतदार संघातून पोपटराव गावडे यांनी शिरूर विधानसभेचे नेतृत्व केले. तर आता सध्या आ. दत्तात्रय भरणे मामा हे इंदापूर मतदारसंघातून गेल्या दहा वर्षापासून राज्याच्या विधानसभेत इंदापूर विधानसभेचे सदस्य म्हणून नेतृत्व करत आहेत.

आज पुणे जिल्ह्यातील पहिले आमदार यांच्या विषयी जाणून घेणार आहोत..

संपादक : धनंजय तानले

      शिरूर तालुक्याच्या एका छोट्याशा गावातून (पारोडी ता.शिरुर जि.पुणे ) राजकारणाचा कोणताही वारसा नसणारा, ज्या कुटुंबात दीडशे माणसं कै. शंकरराव गंगाराम कोकरे उर्फ (मास्तर कोकरे) यांच्या नेतृत्वाखाली  गुण्यागोविंदाने एकत्र राहत होती.  अशा  धनगर समाजात माजी आमदार पोपटराव हरिभाऊ कोकरे यांचा जन्म झाला.

      मास्तर कोकरे स्वतः शिक्षक असल्याने शिक्षणाचे महत्व त्यांना पूर्वीपासून माहित होते आपल्या घरात कोणीतरी वकील असला पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती. आपल्या अथक परिश्रमाने पोपटराव कोकरे  वकील झाले.

      सुरवातीच्या काळात पोपटराव हरिभाऊ कोकरे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.

      त्यांनंतर त्यांचे शिक्षण आणि एकत्र कुटुंबाची पार्श्वभूमी पाहता १९७२ साली त्यांना इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या वतीने  शिरुर मधून विधानसभेची उमेदवारी त्यांना देण्यात आली. त्यावेळी त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून  तळेगावचे रायकुमार गुजर हे होते. या निवणुकीत पोपटराव हरिभाऊ कोकरे आमदार यांना २१९४२ मते मिळाली आणि रायकुमार गुजर यांना १२३२५ मते मिळाली. प्रचंड फरकाने कै.पोपटराव हरिभाऊ कोकरे आमदार विजयी झाले होते.   इंदापुरचे भगवानराव पाटील यांची कन्या अरूनादेवी बरोबर त्यांचा विवाह झाला. इंदापूर पंचायत समितेचे माजी सभापती बाबासाहेब पाटील हे त्यांचे मेहुणे होते.

      हा काळ होता १९७२ चा. महाराष्ट्राच्या विधानसभेत  १९७२  ते १९७८   सहा वर्षाचा कालावधीत काम करण्याची संधी त्यांनां मिळाली. आमदारकीचा कार्यकाल तसा ५  वर्षाचा असतो परंतु त्यांच्या काळात एक वर्ष आणीबाणी जाहीर झाली होती म्हणून एक वर्ष कार्यकाल पुढे ढकलला होता.

      ते एक उत्कृष्ट वकील होते अनेक राजकीय व सर्वसामान्य लोक त्यांच्या कडून मार्गदर्शन घेत असत.

      जुन्या काळात शिक्षणाने अल्प समजला जाणारा, मेंढपाळ व्यवसायाच्या निमित्ताने भटकंती करणारा म्हणून धनगर समाजाकडे पाहिले जायचे. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेत धनगर समाजातला एवढा उच्चशिक्षित जुन्या काळात वकील झालेला आमदार म्हणून त्यांचे नाव आजही घेतले जाते.

      त्यावेळी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध होते.

      त्यांना त्यांच्या कार्यकाळात मंत्रिपदाची संधी देखील आली होती. परंतु तत्कालीन राजकारणामुळे ती संधी त्यांच्यापासून हुकली. हे जुन्या जानकारांना माहीत आहे.

शिरुर तालुका हा दुष्काळी तालुका होता यासाठी सिंचनाची आवश्यकता होती ही गरज पाहून त्यावेळी चासकमान धरणाची मंजुरी मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, आज शिरुर तालुक्याला त्याचा खुप मोठा फायदा होताना दिसत आहे.

     त्यांच्या कार्यकाळात त्यांनी खुप गोर गरीब लोकांची आणि लोकपयोगी अशी भरीव कामे केली. त्यांनी राजकारण न करता केवळ समाजकारण केले. साधी राहणी आणि सर्वसामान्य लोकांमध्ये वावरणारा आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

       त्यांच्या पुढच्या काळात कोकरे कुटूंबियांना  त्यांचा राजकारणाचा वारसा स्थानिक पातळी सोडता फार पुढे संधी मिळाली नाही. परंतु त्यांनी घेतलेल्या उच्च शिक्षणाचा वारसा  आणि वसा आजही कुटुंबातील पुढच्या पिढ्यांनी चालू ठेवला आहे.

     आज कोकरे कुटुंबात बरेच जण वैदयकीय क्षेत्रात, प्रशासकीय विभागात अधिकारी, कृषी ,तंत्रज्ञान क्षेत्रात, तसेच उच्च शिक्षण घेऊन परदेशात देखील कुटुंबाचा नावलौकिक वाढवला आहे.  याचा सर्वांना मनोमन अभिमान वाटतो.

     आमदारांची एक कन्या  डॉक्टर आहेत. दुसरी कन्या  मुलगा देखील उच्चशिक्षित आहेत त्यांचे एक जावई वैदयकीय अधिकारी आणि दुसरे जावई पुणे जिल्हा सहकारी बँकेत अधिकारी आहेत.

    दीडशे माणसांचे हे एकत्र कुटुंब कशा पद्धतीने राहते हे पाहण्यासाठी आवर्जून तत्कालीन कॅबिनेट मंत्री बॅरिस्टर गाडगीळ साहेब पोपटरावांच्या घरी पारोडी ता. शिरुर, याठिकाणी आले होते व दिवसभर थांबून त्यांनी कुटुंबाचे रुटीन कसे चालते हे पहिले होते.

    एकत्र कुटुंबातील संस्कार त्यांच्या मध्ये असल्याकारणाने जनमानसात मिसळणारा आमदार म्हणून शिरुर तालुक्याला ते परिचित होते. आजही शिरूर तालुक्यामध्ये सामजिक, राजकीय सभे मध्ये त्यांचे नाव घेतल्या शिवाय सभा पूर्ण होत नाही. आज त्यांच्या सारखा आमदार होणे शक्य नाही.

लेखक संपादक : धनंजय तानले  

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ॲड. अभिमान हाके पाटील मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने सन्मानित

मुंबई : मूळ पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावचे सुपुत्र असलेले ॲड. अभिमान मायाबाई ज्ञानोबा...

जाहीर निषेध : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारसा महानगरपालिकेने केला उध्वस्त

पुणे : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १७९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणासाठी जीर्णोध्दार...

कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या अध्यक्षपदी प्रा.प्रदिप झोरे तर कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे

मुंबई : कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्‍या  कोकण धनगर समाजोन्नती...

चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय

अहिल्यानगरमधील चौंडी गावात, ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक...