लातूरः धनगर समाजाने आजपर्यंत ST आरक्षण हक्कासाठी संविधानिक मार्गाने सरकारच्या विरोधात अनेक वेळा साखळी उपोषण, रास्तारोको, मुंडण आंदोलन, निवेदने, सभा, मोर्चे, रेल रोको, इ. आंदोलने विधायक मार्गाने केली. याची साधी दखलही सरकारने घेतली नाही व धनगर एस. टी. आरक्षणसंदर्भात अद्यापर्यंत कुठलीच ठोस कार्यवाही केलेली नाही. म्हणून धनगर समाजामध्ये सरकार विषयी प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.
यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे युवक कार्यकर्ते संतापलेले आहेत. म्हणून लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते अनिल भागवत गोयकर व चंद्रकांत हजारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
गेली ७० वर्षे सत्तेत येणार्या प्रत्येक सरकारने धनगर समाजाला घटनेने दिलेले आरक्षण डावलले. धनगर समाज पालात व द-याखो- यात राहणारा, आपला परंपरागत व्यवसाय शेळी-मेंढी पालन व्यवसायासाठी रानोमाळ भटकंती करणारा समाज आहे. या समाजाला घटनेने दिलेल्या एस. टी. च्या शैक्षणिक व राजकीय आरक्षणापासून जाणूनबुजून वंचित ठेवण्याचे काम येथील सत्ताधीशांनी केल्याचा आरोप करीत हे उपोषण करण्यात येत आहे.
या उपोषणाचा आजचा ६ वा दिवस आहे जर राज्य सरकारने या उपोषणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास धनगर समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे.
धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारी कुटुंबीयांनी काढलेले बोगस धनगड जातीचे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावे आदी मागण्यासाठी हे उपोषण चालू केले आहे.
सदर आंदोलनाला राज्यातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा जाहीर केला आहे.